Pages

उपदेश

☆☆☆ उपदेश ☆☆☆

जगामध्ये उपदेश अनेकजण करतात आणि अनेकजण ऐकतातही.उपदेश करण्यासाठी जसा एक अधिकार लागत असतो;तसा उपदेश ऐकण्यासाठीही काही अधिकाराची गरज असते.एखाद्या प्रवचनकाराचे प्रवचन ऐकण्यासाठी आलेल्या
प्रत्येकाच्या बुद्धीच्या मर्यादा वेगऴ्या !
त्यामुऴे काहींना थोडक्यात सांगूनही कऴते आणि काहींना खूप सांगूनही कऴत नाही. संतांच्या भाषेमध्ये जो बदल ब-याच वेऴा जाणवतो,त्याचे मुख्य कारण हेच आहे.म्हणून 'चांगदेवपासष्टी' मध्ये पासष्ट ओव्या आणि श्रीज्ञानेश्वरी
मध्ये नऊ हजार ओव्या ! माणसांचे अंत:करण जेवढे शुद्ध असते, तेवढा तो उपदेश अंत:करणामध्ये लवकर ठसतो. 'रावणाने सीतेला पऴवून आणून चूक केली.त्याने सीतेला परत करावे.प्रभू श्रीरामचंद्रांना शरण जावे , ' असा योग्य उपदेश करणारे काही कमी नव्हते.रावणाची बायको मंदोदरी,भाऊ बिभीषण , माल्यवान या सर्वांनी उपदेश केला.पण रावणाला पटला नाही.
अशीच परिस्थिती दुर्योधनाची आहे.विदुर,भीष्म,द्रोण,स्वत: भगवान श्रीकृष्ण या सर्वांनी सांगून पाहिले; पण उपयोग झाला नाही.पांडवांचे राज्य हरण करण्याचा विचार त्याने सोडला नाही.उलट भगवंतांनी उपदेश केला,त्यावेऴी भगवंतालाच कैदेत टाकण्याचा विचार तो करू लागला त्याला तो पटला नाही.याचे कारण एकच मानावे लागते;रावण काय किंवा दुर्योधन काय, त्यांचे अंत:करण शुद्ध नव्हते.त्यांच्यात विचारांपेक्षा विकारांचे प्राबल्य अधिक होते आणि विकाराने एकदा अंत:करण अशुद्ध बनले की,माणसाला हितदेखील अहितच वाटायला लागते.योगवसिष्ठामध्ये यासंबंधी बोलताना म्हटले आहे की,
अत उक्तं मया राम यदि शुद्धे हि चेतसि ।
उपदेश: प्रसरति तैलबिन्दुरिवाम्भसि ।।
श्रीवसिष्ठ प्रभू रामचंद्रांला सांगतात, ' पाण्यामध्ये पडलेला तेलाचा थेंब जसा सहज पसरतो,तसा शुद्ध अंत:करणाच्या शिष्याला केलेला उपदेश तात्काऴ ठसतो.शुद्ध अंत:करण झालेल्या शिष्याला गुरूंनी एकदा बोध केला की तो मुक्तच होतो.म्हणून आपले अंत:करण शुद्ध करून नेहमीच मोठ्यांच्या उपदेशासाठी तत्पर असावे.कारण मोठी माणसे फार बोलत नाहीत !'