Pages

तरुण वयात परमेश्वराचे नामस्मरण का करावे

तरुण वयात परमेश्वराचे नामस्मरण का करावे 

तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तुत्व करेल त्याच कर्तुत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण ह्या वयात मुले हुशार असतात. तरुण रक्त अंगात सळसळते. ह्या
वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होऊन ह्या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते.

म्हातारपणी नामस्मरण होत नाही कारण त्यांनी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालविलेले असते. त्यामुळे त्यांच्याकडून नामस्मरण झाले तरीही ते देवाला पोहचते. पण दैवीशक्ति त्यांना मिळत नाही. ही शक्ती तरुण वयातच मनुष्याला मिळते.

नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत असते. त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळते. नामस्मरण का कारायचे असते? कारण तरुण वय हे अल्लड असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते. मग त्या मनाला व विचारांना स्थिर फक्त नामस्मरणच करते. त्यांना ह्या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधी फसवेल, कधी घात करेल हे सांगता येत नाही. पण नामस्मरणाने खूप काही समस्या जीवनात सुटू शकतात.

हल्लीच्या मुलांना नेट, टीव्ही, मोबाइल ह्याचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही. सतत तेच तेच जीवन जगल्यामुळे मुलांच्या मनात वाईट विचार येतात. बारीकसारीक गोष्टींवरून चिडतात. लगेच राग येतो. काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुस-याचा घात करतात. पैशांसाठी व्याभिचार करतात. पैसा श्रेष्ठ आहे, संस्कार कमी आहेत अशी ह्यांची अवस्था असते. त्यात त्या स्पर्धा परीक्षा. स्वतःच्या आत्म्याला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतवून ठेवले असल्यामुळे त्यांना जीवन हे नीरस वाटते. दुसऱ्याच्या पुढे जाणे, खूप पैसा कमविणे हेच ह्यांचे ध्येय असते. ह्या सुखवस्तु मिळाल्यामुळे मन विचलीत होवून काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात. वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे. ह्या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते.

नामस्मरणाने एक वेगळीच दैवीशक्ती प्राप्त होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले असेल ते सर्व लक्षात राहते. वाईट कर्म करायला त्या मुलांचे मन घाबरते. कारण मनात नामाची माळ जपली जाते. अशी मुले वाईट कर्म करत नाही त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही. म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात.

नामस्मरणामुळे खुप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जस जसे नामस्मरण वाढते तस तशी दैवी शक्ती वाढते. त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाईट प्रसंग आला तरी देव त्यांचे रक्षण करतो. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे संरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चेहर्‍यावर मेकअपची गरज भासत नाही. तर आपोआप तेज येते. तरुण मुले आणखी सूंदर दिसू लागतात. ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होतो. चिंता भय ह्याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते. देवालाही सुंदर ताजे फुल आवडते म्हणजेच तरुण काळा असो वा गोरा पण त्याचे सुंदर निष्पाप मन देवाला आवडते. म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते.

म्हातारपण आता कोणी पाहिले आहे. मृत्यु कधी येईल सांगू शकत नाही म्हणून देवाचे सतत नामस्मरण करा कारण जीवनातले खरे अमृत तेच आहे.