Pages

पौराणिक कथा


" श्री रामरक्षा स्त्रोत्र उत्पत्ती "                                  
रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की ," एकदा माता पार्वतीने श्री शंकरांस विचारले , जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच श्री रामाचे एखादे स्तोत्र नाही का ?" तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. शंभर कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले.शेवटी श्री शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. शंभर ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात बत्तीस अक्षरे होती. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे श्री शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ते ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवट पर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलकी लागली आणि नेमके त्याचवेळी श्री शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा ' रामरक्षेची ' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी.याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे -                                                                   आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर ॥         तथा लिखितवान्प्रात:प्रबुध्हो बुधकौशिक ॥                   शतकोटीचे बीज वाचे उच्चारी -हे शतकोटीचे बीज म्हणजेच "राम" हि  दोन अक्षरे.
॥श्री राम॥
------------------------------------------------------

वैजयंतीमालेची कथा

भौमासुर राक्षसाच्या वधानंतर त्याच्या पत्नीने श्रीकृष्णाला वैजयंतीमाला व इतर दिव्य वस्तू अर्पण केल्या. त्या वैजयंतीमालेच्या उत्पत्तीची ही कथा.पूर्वी विष्णूच्या दाराशी जय आणि विजय असे सख्खे भाऊ दाखल होते. त्यांचा पिता सुशील हा नावाप्रमाणेच सदाचारी व विष्णुभक्त होता. रोज त्याच्या घरचा नैवेद्य विष्णुलोकी जात असे. जय व विजय यांच्या पत्नी उत्कृष्ट स्वयंपाक करून दोघींपैकी एक तो नैवेद्य सुशील जवळ आणून ठेवी. नैवेद्य समर्पण केल्यावर ते ताट आपोआप विष्णुलोकी जात असे. असे कित्येक वर्षे चालले होते. पण एकदा विजयची पत्नी जयंती हिने नैवेद्य दाखवण्यापूर्वी भाजीची चव बघितल्याने तो नैवेद्य विष्णुलोकी जाईना. सुशीलला जेव्हा खरी हकिगत कळली, तेव्हा रागाच्या भरात त्याने जयंतीला तू शिळा होऊन पडशील अशा शाप दिला. राग शांत झाल्यावर तिची दया येऊन श्रीहरीचा हात लागताच तुझा उद्धार होईल असा उःशाप दिला. त्याप्रमाणे जयंती मेरूपर्वताच्या माथ्यावर सिद्धसरोवरात शिळा होऊन पडली. जयंतीच्या विरहाने वेडा होऊन विजयही त्या सरोवराकाठी सूर्याचे अनुष्ठान करीत बसला. एके दिवशी त्याच्यापुढे एक सुंदर असे कमलपुष्प येऊन पडले. ते दिव्य कमळ शेषांनी सूर्याला अर्पण केलेल्यांपैकी होते. त्याला पाहून विजयला जयंतीची जास्त तीव्रतेने आठवण होऊन त्याने ते कमळ त्या शिलारूपी जयंतीस वाहिले. याप्रमाणे सूर्याकडून मिळालेली एकशेआठ कमळे त्याने त्या शिळेवर वाहिली. त्या एकशे आठ सुवर्णकमळांची त्याने माला गुंफली.इकडे सर्व देवांच्या आग्रहाखातर भगवान विष्णू शंकरांकडे जात असता, वाटेत सिद्धसरोवरापाशी थांबले. ती सुवर्णकमळांची माला त्यांना फारच आवडली व त्यांनी ती शिळेवरून उचलली. माला उचलताना शिळेस हात लागून जयंती पूर्वरूपात आली. मग विजय व जयंती यांना आशीर्वाद देऊन त्या दोघांचे स्मृतिचिन्ह म्हणून विष्णूने ती माला गळ्यात धारण केली. विजय व जयंती या नावांवरून तिचे नाव वैजयंती असे ठेवले व आपल्या भक्ताची स्मृती म्हणून गळ्यात वागवले .